रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे परिसरात दिवसाढवळ्या घरफोडीची धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरट्यांनी बंद घराचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला आणि ऐवज लंपास केला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मिरजोळे येथील पाटील वाडी परिसरात हे घर आहे. राजेश बबन भाटकर पत्नीसह कामासाठी बाहेर गेले असताना, घराला कुलूप होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी भर दुपारी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून चोरटे फरार झाले. घटनेनंतर जेव्हा घरमालक घरी परतले, तेव्हा त्यांना घरफोडी झाल्याचे निदर्शनास आले. चोरीला गेलेल्या दागिन्यांचे वजन सुमारे ९ तोळे असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी शहर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा केला असून, परिसरात कोणा संशयित व्यक्तीची हालचाल दिसली होती का, याचा तपास केला जात आहे. या प्रकरणी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. दिवसाढवळ्या घडलेल्या या चोरीच्या घटनेमुळे मिरजोळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.









