रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई
रत्नागिरी:- रस्ता विचारण्याच्या बहाण्याने वाटचाऱ्यांचे मोबाईल हिसकावून पळ काढणाऱ्या तीन अट्टल चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि चोरीस गेलेले मोबाईल असा एकूण १ लाख ८ रुपयांचा १०० टक्के मुद्देमाल जप्त केला आहे
२१ मे रोजी सायंकाळी सुमारे ६:४५ वाजता पवारवाडी फाटा येथे आशिष कृष्णा जाधव यांना काळ्या रंगाच्या युनिकॉर्न दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात भामट्यांनी चिपळूणचा रस्ता विचारण्याचा बहाणा केला. आशिष काही समजण्याच्या आतच भामट्यांनी त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावला आणि पळ काढला.
त्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात (सायंकाळी ७:१५ वाजता) शिरगाव रहाटवाडी येथील दत्त मंदिरासमोर रिया रोहित शिंदे यांच्याबाबतही याच टोळीने हाच फंडा वापरला. चिपळूणचा रस्ता विचारत रिया यांच्या हातातील मोबाईल हिसकावून तिघेही पसार झाले होते. याप्रकरणी अलोरे पोलीस ठाण्यात ‘भारतीय न्याय संहिता, २०२३’ च्या कलम ३०४ (२) व ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथके तयार करण्यात आली होती. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक समांतर तपास करत असताना गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे संशयित आरोपी सांगली जिल्ह्यात असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या सुगाव्यावरून २२ जुलै २०२६ रोजी मौजे वांगी (ता. कडेगाव, जि. सांगली) येथे छापा टाकून तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. यामध्ये विश्वनाथ अमर शिंदे (वय २३ वर्षे, रा. वांगी, ता. कडेगाव, जि. सांगली), प्रथमेश मलिक मोरे (वय २० वर्षे, रा. वांगी, ता. कडेगाव, जि. सांगली), अक्षय संभाजी जाधव (वय २३ वर्षे, रा. वांगी, ता. कडेगाव, जि. सांगली) या तिघांचा समावेश आहे.
पोलिसांनी सखोल चौकशी केली असता तिघांनीही गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींना जप्त केलेल्या मुद्देमालासह पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी अलोरे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या सूचनेनुसार श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संदीप ओगले, पोलीस हवालदार विजय आंबेकर, दिपराज पाटील, योगेश नार्वेकर आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल अतुल कांबळे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.









