लांजा:- लांजा शहर व परिसरात आज अचानक वातावरणात बदल होत ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. दुपारनंतर आकाशात काळे ढग दाटून आले आणि काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गारांसह पाऊस सुरू झाला. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी आंबा बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
सध्या आंबा हंगामाचा महत्वाचा काळ सुरू असून झाडांवर मोठ्या प्रमाणात आंबा तयार होत आहे. अशा वेळी पडणारा अवकाळी पाऊस आंब्याच्या उत्पादनासाठी घातक ठरू शकतो, अशी भीती बागायतदार व्यक्त करत आहेत. रिमझिम पावसामुळे काही ठिकाणी फळगळ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
लांजा तालुक्यात आंबा हे प्रमुख नगदी पीक असल्याने अनेक शेतकऱ्यांचे अर्थकारण या हंगामावर अवलंबून आहे. त्यामुळे अचानक झालेल्या या हवामान बदलामुळे शेतकरी चिंतेत पडले आहेत. जर पुढील काही दिवस पावसाचे प्रमाण वाढले तर उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला असला तरी बागायतदार मात्र हवामानाकडे लक्ष ठेवून आहेत.









