रत्नागिरीकरांनो पाणी जपून वापरा! सोमवारी शहराचा पाणी पुरवठा राहणार बंद

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत जलवाहिन्या आणि वितरण व्यवस्थेच्या प्रतिबंधात्मक देखभाल व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामामुळे सोमवार, दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी संपूर्ण रत्नागिरी शहराचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती नगरपरिषद प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

पाणी पुरवठा यंत्रणा सुरळीत ठेवण्यासाठी आणि भविष्यातील तांत्रिक बिघाड टाळण्यासाठी ही ‘प्रतिबंधात्मक देखभाल’ अत्यंत आवश्यक आहे. या दुरुस्तीच्या कामामुळे सोमवारी दिवसभर नळांना पाणी येणार नाही, तसेच मंगळवारी सकाळी देखील पाणी पुरवठा कमी दाबाने होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नगरपरिषद प्रशासनाने शहरातील सर्व नागरिकांना विनंती केली आहे की, त्यांनी या बदलाची नोंद घ्यावी. पाणी पुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांनी आदल्या दिवशीच पुरेसा पाणी साठा करून ठेवावा. तसेच, उपलब्ध असलेल्या पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पाणी पुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.