Saturday, May 2, 2026
spot_img
Home रत्नागिरी युद्धाची झळ स्वयंपाकघरापर्यंत, खाद्यतेलाचा उडाला भडका

युद्धाची झळ स्वयंपाकघरापर्यंत, खाद्यतेलाचा उडाला भडका

रत्नागिरी:- अमेरिका-इराण युद्धाची झळ आता थेट स्वयंपाकघरापर्यंत पोहोचली आहे. युद्धामुळे खाद्यतेल पुरवठ्यात समस्या निर्माण झाली आहे. ज्या वस्तू आयात केल्या जात आहेत, त्या वस्तूंच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे खाद्यतेलाच्या दरात गेल्या आठवडाभरात प्रतिकिलो तब्बल बारा रुपयांची वाढ झाली आहे. दि. १ मार्च रोजी १३३ ते १३५ रुपये किलो दराने असणारे सोयाबीन खाद्यतेल सध्या १४५ ते १४७ रुपये किलो दराने विकण्यात येत आहे. सोयाबीनचेही दर वाढले आहेत.

भारत-अमेरिका व्यापार करारामुळे सोयाबीनच्या किमती ५०० रुपये प्रतिक्विंटल कमी झाल्या होत्या. मात्र, मध्य पूर्व देशातील युद्धामुळे व कच्च्या तेलाचे भाव वाढल्याने सोयाबीनचा दर प्रतिक्विंटल सहा हजार रुपये झाला आहे. भारताने एप्रिल ते जुलै या कालावधीत ७५ हजार मेट्रिक टन सोयाबीन आयात करण्याचा साैदा केला होता. मात्र, युद्धामुळे तो रद्द झाला आहे. त्यामुळे आता रिफाइंड तेलाच्या किमती वाढल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीत ३० टक्के दरवाढ झाली असल्यामुळे ग्राहकांना याचा फटका बसत आहे. त्याशिवाय अतिवृष्टीमुळे यावर्षी सोयाबीनचे उत्पादन कमी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. येत्या काही दिवसांत युद्ध थांबले नाही तर आणखी दरवाढ होण्याची भीती आहे.
सोयाबीन, पामोलिन, सूर्यफूल यांसारख्या खाद्यतेलांची आयात मलेशिया, इंडोनेशिया, अर्जेंटिना, ब्राझील या देशांतून केली जाते. मात्र, मध्यपूर्व देशांतर्गत असलेल्या तणावात्मक परिस्थितीची झळ जलवाहतुकीलाही बसली आहे. जलवाहतुकीच्या खर्चात वाढ झाली असल्याने आयात होणाऱ्या खाद्यतेलाच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. वाहतुकीतील अडथळे, जहाजांच्या मार्गातील बदल व वाढलेला विमा खर्च यामुळे आयात वस्तूंमध्ये दरवाढ झाली आहे.

खाद्यतेलाचे प्रकार – पूर्वीचे दर – आताचे दर

सोयाबीन – १३३ – १४५
सूर्यफूल – १५७ – १६५
राइस ब्रँड – १३६ – १४०
शेंगदाणा – १५२ – १६०