रत्नागिरी:- पुणे जिल्ह्यात हातभट्टीच्या विषारी दारुमुळे घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभुमीवर रत्नागिरी जिल्ह्यात विशेष दक्षता घेण्यात येत असुन त्यानुसार दि. २८ मे, २०२६ पासून जिल्ह्यातील हातभट्टी दारुचे उच्चाटन करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे.
या मोहिमेत दि. २८ मे, २०२६ पासून अद्यापपर्यंतच्या कालावधीत जिल्ह्यात निदर्शनास आलेल्या हातभट्टी दारु निर्मिती व विक्री ठिकाणांवर कारवाई करुन एकूण ३८ गुन्हे नोंद करण्यात आले असून ३० संशयित अरोपीना अटक केली आहे. सदर दाखल गुन्ह्यात हातभट्टीची गावठी दारु १.६४० लिटर, गोवा राज्यात विक्रीकरीता असलेले विदेशी मद्य १७.६४ बल्क लिटर, रसायन २३,४०० लिटर तसेच मद्याची अवैधरित्या वाहतुक करणाऱ्या १ वाहनासह एकूण रुपये ११ लाख ६६ हजार 5 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, रत्नागिरी विभागाकडून अवैध मद्याविरुध्दची कारवाई या पुढेही सुरुच राहील. जिल्ह्यात कोठेही हातभट्टी दारुची निर्मित्ती, विक्री, परराज्यातील अवैध मद्याची वाहतूक व मद्यसाठा, बनावट माडी विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास या विभागाचा व्हॉट्सऍप क्रमांक-८४२२००११३३ व टोल फ्री क्रमांक- १८००२३३९९९९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, रत्नागिरी विभागाकडून करण्यात येत आहे. अवैध मद्यासंदर्भात बातमी/खबर देणाऱ्या व्यक्तिचे नाव या विभागाकडून गुप्त ठेवण्यात येईल.









