रत्नागिरी:- तालुक्यातील सोमेश्वर येथे एका विवाहित महिलेने पुलावरून उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी घडली. रमिजा इफ्तिकार हुश्ये (वय ३८, रा. सोमेश्वर, रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या नातेवाईकांनी शनिवारी सकाळी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्यानंतर पोलीस तिचा शोध घेत होते. दरम्यान, सोमेश्वर येथील पुलावर महिलेची ओढणी आणि चप्पल आढळून आल्याने नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली.
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थ व नातेवाईकांच्या मदतीने परिसरात शोधमोहीम सुरू केली. अखेर काही वेळानंतर नदीपात्रात महिलेचा मृतदेह आढळून आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
महिलेने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत अद्याप स्पष्ट कारण समोर आलेले नाही. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून विविध चर्चांना उधाण आले आहे.दरम्यान, आत्महत्येमागील नेमके कारण शोधण्यासाठी रत्नागिरी ग्रामीण पोलीस अधिक तपास करीत आहेत.









