अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलीस अधीक्षकांचे आवाहन
रत्नागिरी:- सध्याच्या जागतिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गॅस टंचाई निर्माण होईल, या भीतीने रत्नागिरीतील नागरिक गॅस एजन्सीबाहेर मोठ्या रांगा लावत आहेत. मात्र, जिल्ह्यामध्ये घरगुती एलपीजी गॅसचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असून नागरिकांनी घाबरून जाण्याचे किंवा रांगा लावण्याचे कोणतेही कारण नाही, असे स्पष्ट आवाहन पोलीस अधीक्षक नितिन बगाटे यांनी केले आहे.
श्री. बगाटे यांनी स्पष्ट केले की, प्रत्येक कुटुंबाला आवश्यक असलेले घरगुती सिलेंडर वेळेवर आणि पुरेसे मिळणार आहेत. केवळ व्यावसायिक (कमर्शियल) वापराच्या सिलेंडरबाबत काही तांत्रिक अडचणी असून त्या सोडवण्यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न सुरू आहेत. लवकरच त्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त होतील. तोपर्यंत नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये.
जिल्ह्यात घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने विविध गॅस एजन्सींना बंदोबस्त पुरवला असून वितरणाची ऑनलाईन यंत्रणाही लवकरच पूर्ण क्षमतेने सुरू होईल. यासंदर्भात पोलीस अधीक्षक स्वतः जिल्हाधिकारी आणि जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून, सर्वसामान्यांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी गडबड न करता सहकार्य करावे, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.









