चिपळूण:- गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका ५५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह चिपळूण येथील गांधारेश्वर पुलाखाली वाशिष्टी नदीच्या पात्रात आढळून आला आहे. विलास महादेव चव्हाण (वय ५५ वर्षे, रा. पेढांबे भाराडेवाडी, ता. चिपळूण) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विलास चव्हाण हे २ जानेवारी २०२६ पासून आपल्या राहत्या घरातून बेपत्ता झाले होते. याप्रकरणी त्यांची पत्नी सौ. विजया विलास चव्हाण यांनी अलोरे शिरगाव पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर ५ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ४.५० वाजताच्या सुमारास गांधारेश्वर मंदिरासमोरील पुलाखाली एका व्यक्तीचा मृतदेह तरंगताना दिसून आला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासणीअंती हा मृतदेह बेपत्ता असलेल्या विलास चव्हाण यांचाच असल्याचे निष्पन्न झाले. ६ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.२८ वाजता या प्रकरणाची , बी.एन.एस.एस. (BNSS) १९४ प्रमाणे आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत









