पोलीस भरतीच्या आमिषाने तरुणाची 5 लाखांची फसवणूक

राजापूर:- तालुक्यातील मोरोशी गावात एका २८ वर्षीय तरुणाची पोलीस भरतीमध्ये मदत करण्याच्या बहाण्याने तब्बल ४ लाख ९० हजार ९०६ रुपयांची फसवणूक झाली. या प्रकरणी ज्ञानेश वसंत पांचाळ (वय ३२, रा. शेपें, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग) याच्या विरोधात राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी लवेश यशवंत कानडे (२८, शिक्षण-बी.ए., व्यवसाय-नोकरी, सध्या रा. जोगेश्वरी पूर्व, मुंबई) याने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ज्ञानेश पांचाळ याने लवेश याला विजय सुतार नावाचा आर्मी ऑफिसर ओळखतो आणि तो पोलीस भरतीसाठी मदत करू शकतो, असे भासवले. यानंतर आरोपीने डिसेंबर २०२० ते १२ ऑगस्ट २०२४ या दरम्यान वेळोवेळी गुगल पे द्वारे फिर्यादीकडून एकूण ४ लाख ९० हजार ९०६ रुपये घेतले.

लवेश कानडे याने आरोपीला पैशांबाबत विचारणा केली असता, तो त्यांना टाळाटाळ करत होता आणि आज-उद्या पैसे देतो, अशी खोटी आश्वासने देत होता. अखेरीस त्रस्त होऊन लवेश कानडे याने ०३ मे २०२५ रोजी राजापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपी ज्ञानेश पांचाळ याच्या विरोधात तक्रार दिली. पोलिसांनी पांचाळ याच्याविरोधात विरोधात भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चे कलम ३१८(४) आणि ३१६(२) अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.