Thursday, June 18, 2026
spot_img
Home रत्नागिरी सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे; कुणीही मुख्यालय सोडू नये: ना. सामंत

सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे; कुणीही मुख्यालय सोडू नये: ना. सामंत

रत्नागिरी:- सध्याच्या पावसाळी परिस्थितीत जिल्ह्यातील सर्वच यंत्रणांनी सतर्क रहावे, मुख्यालय सोडू नये, अशा सूचना पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिल्या. आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठकीत पालकमंत्री डाॕ सामंत मार्गदर्शन करत होते.

या बैठकीला अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, पाटबंधारे अधिक्षक अभियंता महेश सुर्वे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता एम.एस.कुलकर्णी आदी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, मोडकळीस आलेल्या शाळांबाबत जिल्हा परिषदेने विशेष लक्ष देवून काळजी घ्यावी. सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी रस्त्यांवरील खड्डे भरुन घेण्यावर भर द्यावा. सर्वांनीच काळजी घेवून सतर्क रहाणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने सर्व यंत्रणा या सज्ज रहाव्यात. कोणीही मुख्यालय सोडू नये, असेही ते म्हणाले. पालकमंत्र्यांनी यावेळी जिल्ह्यातील पर्जन्यमान, झालेले नुकसान, दिलेला लाभ याबाबत सविस्तर माहिती घेतली. अपर जिल्हाधिकारी श्री. गलांडे यांनी ही माहिती सविस्तर दिली.