Wednesday, May 27, 2026
spot_img
Home राजापूर राजापुरात विजेचा शॉक लागून १३ वर्षीय मुलीचा मृत्यू

राजापुरात विजेचा शॉक लागून १३ वर्षीय मुलीचा मृत्यू

राजापूर:- तालुक्यातील धाऊलवल्ली येथील एका १३ वर्षीय मुलीचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. स्वरांगी संदीप गिजम (13, गिजमवाडी, धाऊलवल्ली राजापूर) असे या मृत मुलीचे नाव असून, या घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संदीप गिजम यांचे कुटुंबीय शेतातील कामासाठी घराबाहेर गेले होते. त्यांची मुलगी स्वरांगी ही एकटीच घरी होती. यावेळी घरातील पंख्याच्या उघड्या वायरला तिचा स्पर्श झाला आणि तिला विजेचा तीव्र धक्का बसला. मात्र घरी कोणीच नसल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.

शेतातील काम आटोपून कुटुंबीय घरी परतल्यावर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र तत्पूर्वीच ती मृत झाली होती. याची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे.