राजापूर:- राजापूर तालुक्यातील अणसुरे शिवडीवाडी येथे राहणाऱ्या ३३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. मंदार मधुकर कणेरी असे या मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना १५ जुलै रोजी रात्री २ वाजण्याच्या सुमारास अणसुरे शिवडीवाडी येथे घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, मंदार कणेरी याचे गेल्या वर्षभरापासून मानसिक संतुलन बिघडले होते. या आजारपणामुळे तो बऱ्याचदा रात्रीच्या वेळी झोपेतून उठून ओरडत असे. दरम्यान, १५ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास मानसिक अस्वस्थतेच्या भरात त्याने आपल्या राहत्या घरातील पडवीत असलेल्या लाकडी वाशाला नायलॉन दोरीने गळफास लावून घेतला. यामध्येच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद नाटे पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.









