Sunday, May 3, 2026
spot_img
Home रत्नागिरी निवळी घाटातील अपघातानंतर लागलेल्या आगीत २५ लाखांचे नुकसान

निवळी घाटातील अपघातानंतर लागलेल्या आगीत २५ लाखांचे नुकसान

रत्नागिरी:- रविवारी सकाळी साडेआठ वाजता निवळी घाटातील जोईल यांच्या घरासमोरील उतारावर गॅस टँकर आणि मिनीबस यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात मिनीबस पलटी झाल्याने ३० जण जखमी झाले, ज्यात चिपळूणमधील सर्वच्या सर्व ३० शिक्षकांचा समावेश आहे. जखमींना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काहींना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.

या अपघातात केवळ मिनीबसच नाही, तर गॅस टँकरही उलटला. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गॅसची गळती झाली, ज्यामुळे परिसरात आग लागून दोन घरे आणि एका झोपडीचे मोठे नुकसान झाले. परिस्थिती धोकादायक बनल्याने पोलिसांनी तातडीने महामार्गावरील वाहतूक थांबवली आणि लहान वाहनांना पर्यायी मार्गाने वळवले.

या घटनेमुळे मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले आहे. संतोष शामराम बेंडखळे यांच्या घर, साहित्य आणि गाड्यांचे मिळून सुमारे सोळा लाख पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले, ज्यात त्यांची मोटारसायकल आणि कार पूर्णपणे जळून खाक झाली. सुधीर शामराम बेंडखळे यांना सुमारे सहा लाखांचा फटका बसला, त्यांच्या म्हैस आणि वासरूला दुखापत झाली, तर त्यांची रिक्षा पूर्णपणे जळून खाक झाली. रविंद्र शेट्ये यांच्या घर आणि साहित्याचे सुमारे एक लाख बेचाळीस हजार रुपयांचे नुकसान झाले. तसेच, लहू दिनकर साळुंखे आणि रेश्मा लहू साळुंखे यांनाही सुमारे सव्वा लाखांचे नुकसान झाले, ज्यात लोहारकामाचे साहित्य आणि त्यांची रोख रक्कमही आगीत भस्मसात झाली. या अपघातात एकूण पंचवीस लाखांहून अधिक मालमत्तेचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्यासह ग्रामीण पोलीस, महामार्ग पोलीस अधिकारी आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. रात्रभर पोलीस आणि ग्रामस्थ मदतकार्यात व्यस्त होते. टँकरमधील गॅस सुरक्षितपणे दुसऱ्या टँकरमध्ये स्थलांतरित केल्यानंतर आणि परिसर सुरक्षित असल्याची खात्री झाल्यावर सुमारे १७ तासांनी महामार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली.

या घटनेनंतर तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी रविवारी दिवसभर घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांनी नुकसानीचे पंचनामे केले. पोलीस पाटील संजना पवार यांच्या तक्रारीवरून टँकर चालक राजेश महावीर यादव याच्यावर ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.