Sunday, July 12, 2026
spot_img
Home गुन्हेगारी देवरूख दरोडा प्रकरणातील मुख्य सुत्रधार सागर कदमला जामीन मंजूर

देवरूख दरोडा प्रकरणातील मुख्य सुत्रधार सागर कदमला जामीन मंजूर

मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचा आदेश

रत्नागिरी:- अपहरण, खंडणी आणि दरोड्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या सागर प्रकाश कदम यांना बॉम्बे उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने नियमित जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती मेहरोज के. पठाण यांनी १ जुलै रोजी हा आदेश दिला. ॲड. राकेश भाटकर यांनी युक्तिवाद केला.

देवरूख पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक १०४/२०२५ मध्ये सागर कदम यांना २० नोव्हेंबर २०२५ रोजी अटक करण्यात आली होती. सप्टेंबर २०२५ मध्ये रात्री १० वाजता देवरुख साखरपा रोडवर एका सोने व्यावसायिकाचे अपहरण करून त्यांच्याकडील रोख रक्कम व दागिने घेतले तसेच पाट लाखाच्या खंडणीची मागणी केली होती. सरकार पक्षाच्या म्हणण्यानुसार, सागर कदम हे गुन्ह्यांचे मुख्य सुत्रधार असून मुख्य आरोपींनी वापरलेले रिव्हॉल्व्हर घटनेनंतर नदीत फेकून पुरावा नष्ट करण्यास त्यांनी मदत केल्याचा आरोप आहे.

अर्जदाराच्या वतीने ॲड. राकेश भाटकर, ॲड. विवेक दुबे आणि ॲड. आर्य आंबुलकर यांनी बाजू मांडली. बचाव पक्षाने न्यायालयात युक्तिवाद करताना, अर्जदाराचा अपहरण, खंडणी किंवा दरोड्याच्या कटात प्रत्यक्ष सहभाग नसून केवळ सहआरोपींच्या जबाबांच्या आधारे त्यांना गुंतविण्यात आल्याचे नमूद केले.

न्यायालयाने निरीक्षण नोंदविले की, उपलब्ध प्रथमदर्शनी पुराव्यानुसार अर्जदाराची भूमिका मुख्य गुन्हा घडल्यानंतर कथित शस्त्र लपविण्यापुरती मर्यादित असल्याचे दिसते. अपहरण, खंडणीची मागणी, दरोडा किंवा कट रचण्यात त्यांचा सहभाग असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत नाही.
न्यायालयाने सागर कदम यांची १ लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर व दोन सक्षम जामीनदारांच्या हमीवर सुटका करण्याचे आदेश दिले. तसेच नियमितपणे तपास अधिकाऱ्यासमोर हजेरी लावणे, साक्षीदारांवर कोणताही प्रभाव न टाकणे अशा विविध अटी घालण्यात आल्या आहेत.