Friday, May 8, 2026
spot_img
Home रत्नागिरी मिऱ्या येथे दोन दुचाकींचा भीषण अपघात; एकजण ठार, तिघे गंभीर जखमी

मिऱ्या येथे दोन दुचाकींचा भीषण अपघात; एकजण ठार, तिघे गंभीर जखमी

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरालगतच्या मिऱ्या रोडवरील भाटी मिऱ्या येथे शनिवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताचा आवाज इतका मोठा होता की, परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. दोन दुचाकींपैकी एक दुचाकी रत्नागिरी शहराकडून मिऱ्याच्या दिशेने जात होती, तर दुसरी दुचाकी मिऱ्याकडून रत्नागिरी शहरात येत होती. भाटी मिऱ्या येथील वळणावर दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोराची धडक झाली.

स्थानिक तरुणा सोबत दुचाकीवर मिळून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. हे तिघेही कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा येथून रत्नागिरीत फिरण्यासाठी आले होते, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. जखमींपैकी एकाच्या दातासह जबडा शरीराबाहेर आल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. अन्य एक जण गंभीर जखमी असून तिसऱ्याला किरकोळ दुखापत झाली आहे.

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी जखमींना तातडीने रुग्णवाहिकेने रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून अधिक तपास सुरू आहे.