मंडणगड:- मंडणगड तालुक्यातील पालवणी येथे नर्सरीमध्ये काम करत असताना सापाने दंश केल्यामुळे एका ३० वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जयश्री जितेंद्र बजे असे या दुर्दैवी महिलेचे नाव असून या घटनेमुळे पालवणी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत जयश्री बजे या २६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजण्याच्या सुमारास पालवणी येथील सोनल सुधाकर आंबीये यांच्या नर्सरीमध्ये नेहमीप्रमाणे कामाला गेल्या होत्या. दुपारी ४:०० वाजण्याच्या सुमारास नर्सरीतील काम करत असताना त्यांना एका पिवळसर रंगाच्या सापाने दंश केला.
सर्पदंश झाल्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्रकृती खालावली होती. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी केली असता त्यांना ‘मृत’ घोषित केले.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर २९ जानेवारी २०२६ रोजी मंडणगड पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे. बी.एन.एस.एस.कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. मयत जयश्री बजे या लाटवण, जांभुळनगर (पोस्ट-पालवणी) येथील रहिवासी होत्या. त्यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.









