रत्नागिरी:- कामाच्या ठिकाणी सतत प्रेयसीसोबत फोनवर बोलत असल्याच्या रागातून भाचाच्या छातीत सुतारकामासाठी वापरात येणारी आरी मारुन खून करणार्या संशयित मामाला न्यायालयाने शुक्रवारी न्यायालयीन कोठडी सुनावली. खूनाची ही घटना शनिवार 2 ऑगस्ट रोजी दुपारी 3 ते 3.30 वा. कालावधीत मिरकरवाडा येथीाल खडप मोहल्ला येथे घडली होती.
निरज तेजपताप निषाद (21 रा.सिकतौर जि.गोरखपूर, उत्तरप्रदेश) असे न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. तर प्रिन्स मंगरू निषाद (19 रा.गोरखपूर,उत्तरप्रदेश) असे खून करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी शहर पोलिसांनी संशयित आरोपी निरज निषादला काही तासातच रत्नागिरी रेल्वे स्टेशन येथून ताब्यात घेत रविवार 3 ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. शुक्रवारी पाच दिवसांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे पोलिसांनी त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.









