रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील टिके भातडेवाडी येथे एका ४१ वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सततचे आजारपण आणि दारूचे व्यसन याला कंटाळून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
मयत मंगेश तुकाराम कांबळे (वय ४१, रा. ६४८, टिके भातडेवाडी, ता. जि. रत्नागिरी) हे गेल्या काही काळापासून आजारपणामुळे त्रस्त होते. तसेच त्यांना दारूचे व्यसनही होते. दि. २१ एप्रिल रोजी रात्री ९ ते दि. २२ एप्रिल रोजी सकाळी ७ च्या दरम्यान, मंगेश यांनी आपल्या राहत्या घरी कोणाच्याही नकळत स्वतःला गळफास लावून घेतला.
सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मंगेश कांबळे यांनी आजारपण आणि व्यसनाच्या नैराश्यातून ही आत्महत्या केल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
याप्रकरणी रत्नागिरी पोलीस ठाण्यात बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.









