लांजा:- तालुक्यातील आंजणारी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सुमारे सहा लाख रुपये किंमतीचे तीन लोखंडी साकव चोरीला गेले असून याबाबत जिल्हा परिषद बांधकाम उप विभाग लांजा मात्र अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणी आंजणारी ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हा परिषद बांधकाम उप विभाग लांजा यांना साकव चोरीला गेल्याचे पत्र सादर केले आहे.
दरम्यान, ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील तीन लोखंडी साकव चोरीला जात असल्याने ग्रामस्थांतून देखील आश्चर्य व्यक्त केले जात आहे. साकव कोणी चोरून नेले? यामध्ये कोणी स्थानिकांचा सहभाग आहे किंवा बाहेरील व्यक्तीचा? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केले जात आहेत. लांजा तालुक्यातील आंजणारी ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील नांदिवली, आंजणारी जोशीवाडी आणि पाष्टेवाडी येथील तीन लोखंडी साकव चोरीला गेले आहेत. या लोखंडी साकवांचा वापर स्थानिक ग्रामस्थांना पावसाळ्यात वहाळाच्या पलीकडे ये-जा करण्यासाठी होत होता. त्यामुळे पावसाळ्यात येथील ग्रामस्थांची मोठी गैरसोय होणार असल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. जिल्हा परिषद बांधकाम उप विभाग लांजा मात्र या चोरीला गेलेल्या लोखंडी साकवाबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, याप्रकरणी कोणतीही माहिती आंजणारी ग्रामपंचायतीला प्राप्त नसल्याने आपल्या स्तरावर योग्य ती कार्यवाही व्हावी अशा मागणीचे निवेदन आंजणारी ग्रामपंचायतीच्यावतीने सरपंच प्रवीण शिकरे आणि ग्रामसेवक समीर गमरे यांनी जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग लांजा यांना सादर केले आहे.









