रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावरील अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या हातखांबा घाटात आज एक भीषण अपघात घडला. कर्नाटकवरून सिमेंट घेऊन रत्नागिरीच्या दिशेने येणारा एक भलामोठा टँकर घाटातील वळणावर ताबा सुटल्याने कलंडला. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तब्बल दोन तास महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर टँकर कर्नाटक राज्यातून सिमेंटचा साठा घेऊन रत्नागिरीकडे येत होता. हातखंबा घाटातील तीव्र वळणाचा अंदाज न आल्याने किंवा तांत्रिक बिघाडामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि टँकर रस्त्याच्या कडेला पलटी झाला. टँकर कलंडल्याने रस्त्याचा काही भाग व्यापला गेल्याने वाहतुकीसाठी अडथळा निर्माण झाला होता.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन व्यवस्थापन पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. टँकर मोठा असल्याने तो बाजूला करण्यासाठी क्रेन पाचारण करण्यात आली. अथक प्रयत्नानंतर क्रेनच्या मदतीने टँकर बाजूला करण्यात आला. सुदैवाने, या अपघातात अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, मात्र टँकरचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.









