रत्नागिरी:- कुवारबाव-साईनगर येथे काही दिवसांपूर्वी सूरज राजाराम झोरे (25) या तरुणाच्या खून प्रकरणातील तीन संशयितांना न्यायालयाने मंगळवारी न्यायालयीन कोठडी सुनावली.
सोहम एकनाथ म्हात्रे(18,रा.शांतीनगर रसाळवाडी, रत्नागिरी),अभिषेक देवानंद राठोड(22, रा.आदिनाथ नगर झोपडपटटी,रत्नागिरी) आणि नजीबूल शेख उर्फ सोनू (21, रा.शांतीनगर रसाळवाडी,रत्नागिरी) अशी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेल्या तीन संशयितांची नावे आहेत. सोहम आणि सुरज यांच्यात एक वर्षापूर्वी झालेल्या आर्थिक व्यवहारातून भांडण झाले होते. त्यानंतर सुरेश हा सोहम म्हात्रे आणि त्याच्या वडिलांना शिवीगाळ करायचा तसेच सूरेश हा सोहमच्या मैत्रिणिला सोहम विरोधात सतत भडकवत होता कि,तू सोहम सोबत राहू नकोस तो तुला एक दिवस सोडून देईल. ही सर्व खदखद मनात ठेवून सोहमने सुरेशचा काटा काढला होता. या घटनेनंतर शहर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत तिन्ही संशयितांना अटक केली होती. न्यायालयाने त्यांना 2 जून पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. मंगळवारी त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन्ही संशयितांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.









