रत्नागिरी:- शिमगोत्सवातील पारंपारिक पद्धतीप्रमाणे वरवडे खाडीत फिरण्यासाठी गेलेली खारवीवाड्यातील खाजगी बोट बुडाली. बोटीतील सुमारे १२ मुली पाण्यात पडल्या मात्र शिमगोत्सवामुळे किनार्यावर स्थानिक मच्छिमार उपस्थित असल्याने त्यांनी तात्काळ सर्व मुलींना पाण्याबाहेर काढले. त्यानंतर त्यांना मालगुंड प्रा.आ. केंद्रात दाखल करण्यात आले होते. सायंकाळी त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. मात्र एकाच वेळी बुडालेल्या १२ मुलींना स्थानिकांनी पाण्यातून बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.रविवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली.
दरवर्षी शिमगोत्सवाला खाडीत सहकुटुंब नौका घेऊन जाण्याची वरवडे खारवीवाडा येथील समाजाची प्रथा आहे. रविवारी असलेल्या होळीनिमित्त वरवडे येथील काही नौका खाडीत उतरल्या होत्या. यातील एक नौका खाडीत बुडाली. या नौकेत प्रमाणापेक्षा अधिक माणसे असल्याने वजन वाढल्याने ही नौका खाडीत बुडाली. या बोटीत एकाच कुटुंबातील जवळपास १२ मुली होत्या. संबधित नौका निलेश सुर्वे यांच्या मालकीची आहे. बोट उलटताच बोटीतील मुलींनी एकच आरडाओरड केली. यावेळी आजूबाजूला असलेल्या नौका मालकांनी बचावासाठी धाव घेतली. आजूबाजूला असलेल्या नोकांमधील ग्रामस्थांच्या सहकार्याने बुडालेल्या जवळपास तीस जणांना वाचवण्यात यश आले.
या घटनेची माहिती मिळताच उपविभागिय अधिकारी निलेश माईनकर, जयगडचे सहाय्यक पोलीस निरिक्षक कुलदिप पाटील, पोलीस उपनिरिक्षक क्रांती पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांनी पाण्यातून बाहेर काढलेल्या १२ मुलींना मालगुंड प्रा.केंद्रात दाखल करण्यात आले होते. सर्व मुलींची प्रकृती उत्तम असल्याने सायंकाळी त्यांना घरी सोडण्यात आले. मात्र ऐन शिमगोत्सवात नौका बुडाल्यामुळे परिसरात खळबळ उडाली होती.









