रत्नागिरी:- मच्छीमार बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि कोकण किनारपट्टीचा सर्वांगीण विकास घडवण्यासाठी आम्ही अतिक्रमण हटवण्यासारखा निर्णय घेतला. मात्र त्याचे गैरसमज पसरवले गेले. तरीदेखील तो निर्णय अमलात आणला, त्यामुळेच मिरकरवाडा येथील विकासाचा मार्ग मोकळा झाला. आता मच्छिमारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारा विकास मिरकरवाडा येथे होईल असा विश्वास देत भूमिपूजन झालेली कामे येत्या वर्षभरात पूर्ण अशी ग्वाही मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री ना. नितेश राणे यांनी दिली.
मिरकरवाडा बंदराच्या दुसऱ्या टप्प्याच्या विकास प्रकल्पाचे भूमिपूजन रत्नागिरी येथे ना. राणे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते रविवारी मोठ्या उत्साहात पार पडले. या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, माजी आरोग्य सभापती बाबू म्हाप, शिवसेना शहराध्यक्ष बिपीन बंदरकर, माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी, माजी नगरसेवक राजन शेट्ये, भाजप शहराध्यक्ष दादा ढेकणे, महिला जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे, तालुकाध्यक्ष दादा दळी, विवेक सुर्वे, प्रतीक देसाई यांच्यासह अनेक पदाधिकारी तसेच मत्स्य व्यवसाय आयुक्त किशोर तावडे, व्यवस्थापकीय संचालक अविनाश पाठक व अन्य अधिकारी, पदाधिकारी, पोलीस अधिकारी आणि स्थानिक मच्छीमार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी बोलताना राणे म्हणाले, “महायुती सरकार सत्तेत आले तेव्हा आम्ही कोकण किनारपट्टीच्या सशक्तीकरणाच्या दृष्टीने पावले टाकायला सुरुवात केली. त्यामध्ये मिरकरवाडा बंदराचा विकास आमच्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा होता. मात्र इथे अतिक्रमणाच्या अडचणी समोर आल्या. काहींनी आमच्याबद्दल गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही ठाम राहिलो आणि त्यामुळेच आजचा दिवस उजाडला आहे.
ना. राणे म्हणाले की, “हे सरकार हिंदुत्ववादी विचारसरणीचे आहे. भारत माता की जय म्हणणाऱ्या आणि देशाशी निष्ठा ठेवणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या भविष्य घडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आता इथला दुसऱ्या टप्प्यात विविध विकासकामांचा समावेश असून, बंदराची कार्यक्षमता वाढवण्यासाठी साठवण क्षमता, बर्फ कारखाने, सांडपाणी व्यवस्था, मासेमारीची यंत्रणा आणि इतर सोयी सुविधा यांचा समावेश आहे.
इथले अतिक्रमण हटवताना पालकमंत्री उदय सामंत यांनी केलेल्या सहकार्याचा ना. राणे यांनी आवर्जून उल्लेख करत त्यांचे या विकास प्रक्रियेकडे लक्ष असून लवकरच तिसऱ्या टप्प्यातील विकासासाठी सज्ज राहणार आहोत असे ते म्हणाले. आजचा हा विकासदृष्टीकोन मच्छीमार समाजाच्या भविष्यासाठी महत्त्वाचा आहे, असे त्यांनी सांगितले असेही त्यांनी सांगितले.









