रत्नागिरी:- तालुक्यातील बसणी येथे दुचाकी आणि रिक्षाची समोरासमोर धडक होऊन गंभीर अपघात झाला. या अपघातात दुचाकी चालक आणि रिक्षा चालक दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.
रविवारी सायंकाळी चैतन्य सहदेव पवार (32, रा.क्रांतीनगर, रत्नागिरी ) आपल्या ताब्यातील रिक्षा घेऊन नेवरे ते रत्नागिरी असा येत होता. त्याचवेळी वैभव नथुराम पवार (31, सोमेश्वर, रत्नागिरी ) हे पत्नी सोबत आपल्या ताब्यातील दुचाकीने नेवरेच्या दिशेने जात होते. ही दोन्ही वाहने बसणी येथे आली असता रिक्षा चालकाने रस्त्याच्या विरुद्ध दिशेला येऊन वैभव पवार यांच्या दुचाकीला धडक देत अपघात केला. ही धडक इतकी जोरदार होती कि त्यामुळे रिक्षाच्या दर्शनी भागातील काचेचा चक्काचूर होऊन दोन्ही चालक गंभीर जखमी झाले.अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. रात्री उशिरा रिक्षा चालकावर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.