राजापूर:- राजापूर तालुक्यातील दांडे अणसुरे येथील एक ६५ वर्षीय वृद्ध महिला बेपत्ता झाल्यानंतर त्यांचा मृतदेह बाकाळे समुद्रकिनारी पाण्यात मिळून आल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या प्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिला गितांजली गोरखनाथ पाटील (वय ६५, रा. दांडे अणसुरे) या १३ जून रोजी सायंकाळी ५.३० च्या सुमारास कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेल्या होत्या. त्या मानसिक तणावाखाली (वेड्याच्या भरात) असल्याने कुटुंबाची चिंता वाढली होती. रात्र उलटूनही त्या परत न आल्याने त्यांचे पुत्र स्वपनेश गोरखनाथ पाटील आणि भाऊ सम्राट पाटील यांनी ग्रामस्थांच्या मदतीने त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. शोध घेत असताना, १४ जून रोजी सकाळी ९.३० च्या सुमारास बाकाळे समुद्रकिनारी समुद्राच्या पाण्यात त्यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या प्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद (आमृ. क्रमांक १६/२०२६, बी.एन.एस.एस. १९४) करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.









