रत्नागिरी:- दारूच्या नशेत बेदरकारपणे दुचाकी चालवून समोरून येणाऱ्या दुचाकीस धडक देत अपघात केल्याप्रकरणी एकाविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ही घटना शुक्रवारी दुपारी 3.30 वा.सुमारास रत्नागिरी-साखरतर रस्त्यावरील पुलाच्या अलीकडे घडली.
समीर आत्माराम पवार (रा.कोतवडे,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे.त्याच्याविरोधात शहाबाज महम्मद बशीर मीरकर (38,रा.साखरतर,रत्नागिरी) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे.त्यानुसार,शुक्रवारी मीरकर आपल्या ताब्यातील दुचाकी (mh-08-ठि-2794) घेऊन साखरतर ते रत्नागिरी असे येत होते.त्याच सुमारास समीर आपल्या ताब्यातील दुचाकी (mh-08-एएल-3384) बेदरकारपणे चालवत समोरून येत होता. ही दोन्ही वाहने साखरतर पुलाच्या अलीकडे आली असता समीरने रस्त्याच्या विरुद्ध बाजूला जात शहाबाज यांच्या दुचाकीस धडक देत अपघात केला. यात शहाबाज यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्या दुचाकीचे ही नुकसान झाले आहे.अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार राठोड करत आहेत.