रत्नागिरी:- भुताने पत्नीला उचलून नेले असा बनाव करत पत्नीचा गळा आवळून खून केल्याप्रकरणी न्यायालयाने पती गजानन जगन्नाथ भोंवड (रा. सुतारवाडी, ता. राजापूर) याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
२५ जून २०२१ रोजी आरोपी गजानन भोंवड याने आपल्या पत्नी सिद्धी उर्फ विद्या हिचा खून केला होता. पत्नी वेळेवर जेवण देत नाही, मुलांकडे लक्ष देत नाही, तसेच घरच्यांसोबत वाद घालते, या कारणावरून दोघांमध्ये वारंवार भांडण होत असे.
त्या दिवशी आरोपीने “मी तुला तुझ्या बहिणीकडे नेतो” असे सांगून पत्नीला जंगलमय सुतारवाडी तट भागात नेले. तेथे तिला हाताने नाक-तोंड दाबून ठार मारले आणि मृतदेह गवतात लपवून ठेवला. पोलिसांना फसविण्यासाठी आरोपीने “भूताने पत्नीला उचलून नेले” असा खोटा बनाव रचला होता.
या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक परबकर यांनी केला. सरकारतर्फे अति. सरकारी वकील अॅड. प्रफुल्ल साळवी यांनी प्रभावीपणे बाजू मांडली.
या प्रकरणात एकूण १४ साक्षीदार तपासण्यात आले. आरोपीची बहीण, मेहूणा आणि सरपंच फितूर झाले असले तरी, परिस्थितीजन्य पुरावे व वैद्यकीय साक्षांमुळे आरोपीचा गुन्हा सिद्ध झाला.
या खटल्यात न्यालयालायाने गजानन जगन्नाथ भोंवड याला जन्मठेप व ५ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. दंडापैकी 5,000 रक्कम फिर्यादीच्या आईला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या खटल्यात सरकार पक्षातर्फे सरकारी वकील – अॅड. प्रफुल्ल रामचंद्र साळवी यांनी काम पाहिले तर कोर्ट पैरवी – विकास खंदारे (पो. शिपाई) तपास अधिकारी – परबकर (पोलीस निरीक्षक) यांचे विशेष सहकार्य लाभले.









