दापोली:- तालुक्यातील केळशी येथे पूर्ववैमनस्यातून झालेल्या जुन्या भांडणाच्या वादातून एका तरुणावर आणि त्याच्या कुटुंबीयांवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात भारतीय न्यायसंहितेच्या विविध गंभीर कलमांसह महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४:४० वाजताच्या सुमारास केळशी मोहल्ल्यातील जिल्हा परिषद उर्दू शाळेजवळ ही घटना घडली. फिर्यादी रिजवान दाऊद अलबा (वय ३२, रा. केळशी नबी मोहल्ला) आणि आरोपी क्रमांक १ रियाज अली बोरकर यांच्यात यापूर्वी काही कारणावरून वाद झाला होता. याच वादाचा राग मनात धरून सर्व आठही आरोपींनी एकत्र येऊन फिर्यादी रिजवान अलबा यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
या हल्ल्यात आरोपी रियाज अली बोरकर याने फिर्यादीच्या डाव्या डोळ्यावर बुक्क्याने मारून दुखापत केली, तर इतर आरोपींनी मिळून त्यांना जमिनीवर पाडून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. एवढेच नव्हे तर, “आज तुला संपवून टाकतो,” अशी धमकीही आरोपींनी दिली. दरम्यान, भांडण सोडवण्यासाठी आलेले फिर्यादीचे मित्र अबरार इस्माईल डायली, रियान इक्बाल चाऊस, नाजीम इक्बाल डायली, फिर्यादीची आई हमीदा दाऊद अलबा आणि मेहुणे मसूद शरीफ बोरकर हे बीचमध्ये आले असता, आरोपींनी त्यांनाही मारहाण केली. या हल्ल्यात फिर्यादीचे मेहुणे मसूद शरीफ बोरकर यांच्या उजव्या गालावर दुखापत झाली आहे.
याप्रकरणी फिर्यादी रिजवान दाऊद अलबा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दापोली पोलीस ठाण्यात आरोपी रियाज अली बोरकर, कबीर इलियास चाऊस, अली इलियास चाऊस, समीउल्ला फराज चाऊस, इलियास अली चाऊस, फईम इलियास चाऊस, जमशीद इलियास चाऊस आणि वहीद आशिफ खमसे (सर्व रा. केळशी नबी मोहल्ला, ता. दापोली) यांच्याविरोधात गु.र.नं. १७१/२०२६ नुसार कलम १८९(२), १९०, ११५(२), ३५१(२) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१)(३)/१३५ अन्वये २७ ऑगस्ट रोजी रात्री २:३९ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.









