Saturday, July 11, 2026
spot_img
Home रत्नागिरी गणेशोत्सवाच्या रेल्वे बुकिंगचे वेळापत्रक जाहीर

गणेशोत्सवाच्या रेल्वे बुकिंगचे वेळापत्रक जाहीर

१३ जुलैपासून बुकिंग, ‘स्पेशल’ गाड्यांचीही शक्यता

रत्नागिरी:- गणरायाच्या आगमनाला अजून दोन महिने बाकी असले, तरी चाकरमान्यांच्या मनात मात्र आतापासूनच बाप्पाच्या स्वागताची तयारी सुरू झाली आहे. “यंदा गावी जायला रेल्वेचं तिकीट मिळेल ना?” अशा चर्चांना आता वेग आला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकणात जाणाऱ्या लाखो भाविकांसाठी सर्वात मोठा प्रश्न असतो तो रेल्वे आरक्षणाचा. अशा चाकरमान्यांसाठी दिलासादायक बातमी म्हणजे, गणेशोत्सव २०२६ साठी रेल्वे आरक्षणाच्या तारखा निश्चित झाल्या असून १३ जुलैपासून पहिल्या टप्प्यातील बुकिंगला सुरुवात होणार आहे.

यंदा गणेश चतुर्थी १४ सप्टेंबर २०२६ रोजी, सोमवारी साजरी होणार आहे. त्यानंतर १५ सप्टेंबरला ऋषीपंचमी, १७ सप्टेंबरला ज्येष्ठ गौरी आगमन, तर १८ सप्टेंबरला गौरी पूजन होणार आहे. यंदाचा गणेशोत्सव १४ ते २५ सप्टेंबर या कालावधीत साजरा केला जाणार आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवलीसह मुंबई महानगर परिसरातील लाखो चाकरमानी ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान गावी पोहोचण्याचे नियोजन करत आहेत.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे आरक्षणाची तारीखही निश्चित झाली आहे. भारतीय रेल्वेच्या १२० दिवसांच्या आगाऊ आरक्षण नियमांनुसार ११ सप्टेंबरच्या प्रवासासाठी १३ जुलैपासून बुकिंग सुरू होईल. त्यानंतर १२ सप्टेंबरच्या प्रवासासाठी १४ जुलै, १३ सप्टेंबरसाठी १५ जुलै, गणेश चतुर्थी अर्थात १४ सप्टेंबरच्या प्रवासासाठी १६ जुलै आणि गौरी आगमनासाठी १७ सप्टेंबरच्या प्रवासाचे आरक्षण १९ जुलैपासून सुरू होणार आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही बुकिंग सुरू झाल्यानंतर काही मिनिटांतच अनेक गाड्यांमध्ये वेटिंग लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांनी सकाळी ८ वाजण्यापूर्वीच आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर किंवा मोबाईल ॲपवर लॉग-इन करून तयारीत राहावे, असे रेल्वे जाणकारांचे मत आहे. पीआरएस आरक्षण केंद्रांवरही याच वेळेत बुकिंग सुरू होईल.

गणपती स्पेशल ट्रेनची घोषणा कधी होणार?

सध्या मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि कोकण रेल्वेकडून गणपती विशेष गाड्यांची अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र, दरवर्षीप्रमाणे यंदाही जुलैच्या मध्यापासून विशेष गाड्यांची घोषणा होण्याची शक्यता आहे.

गेल्या काही वर्षांतील आकडे पाहिले तर गणेशोत्सवासाठी रेल्वेकडून चालवल्या जाणाऱ्या विशेष फेऱ्यांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. २०२३ मध्ये ३०५, २०२४ मध्ये ३५८, तर २०२५ मध्ये तब्बल ३८० विशेष फेऱ्या चालवण्यात आल्या होत्या. त्यामुळे यंदाही प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणात विशेष गाड्या सोडल्या जाण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.