रत्नागिरी:- पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गणपतीपुळे मार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, आज मासेबाव बसथांब्याजवळ एक भीषण दुचाकी अपघात घडला. या अपघातात दुचाकीवरील दोघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी तातडीने जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित दुचाकीस्वार गणपतीपुळेच्या दिशेने जात असताना मासेबाव बसथांब्याजवळ त्यांच्या दुचाकीचा ताबा सुटला आणि हा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की, दुचाकीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता.
अपघात घडल्यानंतर परिसरातील ग्रामस्थ आणि प्रवाशांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने रुग्णवाहिकेने रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत, मात्र ते स्थानिक भागातीलच असल्याचे सांगण्यात येत आहे.
गणपतीपुळे कडे जाणाऱ्या या मार्गावर वाहनांची वर्दळ मोठी असते. मासेबाव परिसरातील वळणे आणि वेगावर नियंत्रण नसल्यामुळे येथे वारंवार अपघात होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या अपघातामुळे मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.









