रत्नागिरी:- शहराजवळील कारवांचीवाडी फाट्यावर १ मे रोजी सायंकाळी झालेल्या भीषण मोटार अपघातात एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. प्रभाकर शांताराम साळवी (वय ६६, रा. रॉयल अपार्टमेंट, श्रीनगर खेडशी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साळवी हे कारवांचीवाडी फाटा येथे रस्ता ओलांडत असताना रत्नागिरी ते हातखंबा मार्गावरून येणाऱ्या एमएच ०८ बीई ३३७९ या क्रमांकाच्या कारने त्यांना जोराची धडक दिली. ही कार अभिजीत प्रभाकर मोहीते (रा. एमआयडीसी मिरजोळे) चालवत होता. वाहन भरधाव वेगात असल्याने साळवी गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर स्थानिकांच्या मदतीने त्यांना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना रात्री सुमारे ९ वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणी रुपेश सुधाकर सुर्वे (वय ३५, रा. खेडशी) यांनी फिर्याद दिली असून, संबंधित वाहन चालकाविरोधात भारतीय दंड संहिता २०२३ मधील कलम १०६ (१), १२५ (अ), १२५ (ब), तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास रत्नागिरी ग्रामीण पोलीस करत आहेत.









