रत्नागिरी:- फटाक्यांच्या आतषबाजी ऐवजी ढगांचा गडगडाट झाला आणि लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर वीजपुरवठा खंडित झाल्याने एकच गोंधळ उडाला. परतीच्या पावसाने मंगळवारी पुन्हा दाणादाण उडवली. दिवसभर कडाक्याच्या उन्हामुळे रत्नागिरीकर हैराण असतानाच मंगळवारी सायंकाळी सव्वासहा वाजता ढगांचा गडगडाट आणि वीजांचा लखलखाट करत पावसाने हजेरी लावली.
पाऊस सुरू होताच महावितरणचा वीज पुरवठा खंडित झाला. सक्ष्मीपुजनाच्या मुहूर्तावरच वीज पुरवठा खंडित झाल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. रात्री उशिरा पर्यंत पाऊस पडत होता. यंदा जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडला आहे. सरासरी सव्वातीन हजार मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. यंदा मे महिन्यात पडलेल्या पावसाने जसा दणका दिला होता तसाच परतीचा पाऊस ही शेतकऱ्यांना दणका देऊन जात आहे. मंगळवारी सायंकाळी आलेल्या पावसामुळे लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर बाजारपेठत आलेल्या मंडळींची त्रेधातिरपीट उडाली.