चिपळूण:- चिपळूण तालुक्यातील कळवंडे परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या नऊ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका ६५ वर्षीय वृद्धाचा मृतदेह स्थानिक डोंगराळ भागातील काजूच्या बागेत आढळून आला आहे. या घटनेमुळे कळवंडे माठवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मयत लक्ष्मण बाबु हुमणे (वय ६५, रा. कळवंडे माठवाडी, ता. चिपळूण) हे १ मे २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजण्याच्या सुमारास आपल्या राहत्या घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेले होते. बराच वेळ झाला तरी ते घरी न परतल्याने नातेवाईकांनी त्यांची सर्वत्र शोधमोहीम राबवली होती, मात्र त्यांचा कोणताही पत्ता लागत नव्हता.
शनिवारी, ९ मे २०२६ रोजी सकाळी ८:०० वाजण्याच्या सुमारास कळवंडे येथील ‘बारकोंबळा’ नावाच्या स्थानिक डोंगराळ भागातील एका काजूच्या बागेत त्यांचा मृतदेह आढळून आला. १ मे ते ९ मे या कालावधीत त्यांचा मृत्यू नेमका कधी आणि कसा झाला, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
या घटनेची माहिती मिळताच चिपळूण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. लक्ष्मण हुमणे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद (अकस्मात मृत्यू क्र. १९/२०२६) करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.









