Thursday, June 11, 2026
spot_img
Home राजापूर अनुस्कुरा घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प

अनुस्कुरा घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प

रत्नागिरी:- रत्नागिरी आणि कोल्हापूरला जोडणाऱ्या अनुस्कुरा घाटात आज मंगळवारी सकाळी दरड कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंदाजानुसार, आज सकाळी १० वाजेपर्यंत हा मार्ग वाहतुकीसाठी पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.

आज पहाटेच्या सुमारास घाटातील एका वळणावर मोठी दरड कोसळली. त्यामुळे रस्त्यावर माती आणि दगड मोठ्या प्रमाणात पसरले. या घटनेमुळे दोन्ही बाजूंनी अनेक वाहने अडकून पडली आहेत. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाल्याचे वृत्त नाही.

माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. दरड हटवण्यासाठी तातडीने यंत्रसामग्री मागवण्यात आली असून, युद्धपातळीवर काम सुरू आहे. प्रवाशांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. जोपर्यंत रस्ता पूर्णपणे सुरक्षित होत नाही, तोपर्यंत वाहनचालकांनी अनुस्कुरा घाटात प्रवेश करू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.