रत्नागिरीत निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याच्या घरातून 11 तोळे सोने लंपास 

रत्नागिरी:- शहरातील नाचणेनजिकच्या छत्रपती नगर येथे राहणारे निवृत्त पोलीस कर्मचारी श्रीधर राजाराम सावंत यांचे  बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी ११ तोळे सोन्यासह रोकड असा ३ लाख ४८ हजरांचा ऐवज लंपास केला.या चोरीमुळे शहरात खळबळ उडाली आहे. 

श्रीधर सावंत हे आपल्या पत्नीसह दि.१६ नोव्हेंबरला भाऊबीज असल्याने कसोप येथे पत्नीच्या माहेरी कुटुंबासह गेले होते. त्यानंतर मंगळवारी ते रत्नागिरी शहरात परतले. त्यानंतर ते पत्नीला घेऊन डॉक्टरकडे गेले होते. दुपारी ते आपल्या राहत्या घरी आले. यावेळी त्यांना घराचा मुख्य दरवाजा उघडल्यानंतर आतील खोल्यांचे दरवाजे उघडे असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी बेडरूम मध्ये जाऊन पाहिले असता कपडे व  साहित्य अस्ताव्यस्त टाकलेले होते, तर खिडकीचे गज कापलेले होते.

घर बंद असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी खिडकीचे गज कापून आत प्रवेश केला. कपाटातील लॉकर मध्ये असलेले ११ तोळे सोन्याचे दागिन्यासह सहा हजारांची रोकड लंपास केली. त्यामध्ये १ लाख ६५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र, ३० हजार रुपये किमतीची सोन्याची चैन,६ हजारच्या अंगठ्या, ६ हजार रु.च्या सोन्याच्या दोन नथ, ९० हजार रु.च्या सोन्याच्या पाटल्या, ४५ हजार रु.चे ब्रेसलेट, ६ हजार रु.ची रोकड असा ३ लाख ४८ हजार चोरट्यांनी लंपास केला. श्रीधर सावंत यांनी सायंकाळी शहर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी रात्री उशिरा अज्ञात चोरट्यांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोरीची माहिती मिळताच पोलीस निरिक्षक अनिल लाड, हे.कॉ. लक्ष्मण कोकरे,पो.नाईक भिसे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचानामा करण्यात आला आहे. चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलीसांनी पथके तैनात केली आहेत.