रत्नागिरी:- राजापूरहून रत्नागिरीच्या दिशेने येणाऱ्या एसटी बसने टीआरपी परिसरातील सावंत पॅलेस हॉटेलसमोर रस्त्यावर आलेल्या गायीला जोरदार धडक दिल्याची घटना घडली. ही घटना आज सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली.या अपघातात गायीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे रत्नागिरी शहर व परिसरातील मोकाट गुरांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
राजापूर-रत्नागिरी एसटी बस टीआरपीजवळ आली असता रस्त्यावर असलेल्या गायीला बसची धडक बसली. अपघातानंतर बसमधील प्रवाशांना दुसऱ्या बसमधून रत्नागिरीकडे रवाना करण्यात आले. तर चालक बससह घटनास्थळीच थांबून राहिला.
विशेष म्हणजे, अवघ्या चार दिवसांपूर्वी येथेच एका बैलाला वाहनाने उडवले होते. या अपघातात बैल गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर आता पुन्हा एसटी बसच्या धडकेत गायीचा मृत्यू झाल्याने रत्नागिरीतील रस्त्यांवर मोकाट फिरणाऱ्या गुरांचा प्रश्न किती गंभीर बनला आहे, हे अधोरेखित झाले आहे.
रस्त्यावर मोकाट गुरे फिरत असल्याने वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, रात्रीच्या वेळी अपघाताचा धोका अधिक वाढतो. वारंवार घडणाऱ्या या घटनांनंतर संबंधित प्रशासनाने मोकाट गुरांचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.









