रत्नागिरी:- शहरातील कुवारबाव परिसरात ३१ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. शंन्मुख आप्पासाहेब निंबाळ (वय ३१, रा. वृंदावन सोसायटी, कुवारबाव, रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ७ सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे ८ वाजेपर्यंत शंन्मुख निंबाळ हे उठले नसल्याने त्यांच्या पत्नी साधना निंबाळ त्यांना उठवण्यासाठी टेरेसवर गेल्या. त्यावेळी शंन्मुख यांनी कपडे वाळत घालण्यासाठी लोखंडी अँगलला बांधलेल्या काळ्या रंगाच्या केबलच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
त्यानंतर त्यांना तातडीने खासगी रुग्णवाहिकेतून उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दुपारी १२.३५ वाजता तपासून त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक १०७/२०२६, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अन्वये करण्यात आली आहे. तरुणाच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.









