सामाईक जमिनीतील खैराची झाडे चोरीला
राजापूर:- तळगाव (ता. राजापूर) येथील मौजे तळगाव शिवारात सामाईक जमिनीतून चार खैराची झाडे चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीविरोधात कायदेशीर कारवाई सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९.०० ते ६ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ५.३० या कालावधीत ही चोरीची घटना घडली. तळगाव येथील सर्व्हे नं. २७६५, ‘गौळणमळी’ परिसरातील फिर्यादी भूषण विलास सावंत यांच्या वडिलांच्या मालकीच्या सामाईक जमिनीतून ही झाडे तोडण्यात आली आहेत.
फिर्यादी भूषण विलास सावंत (वय ३४, रा. तळगाव पाटीलवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी प्रताप संजय सावंत (वय ३१, रा. तळगाव पाटीलवाडी) याने कोणतीही परवानगी न घेता जमिनीतील ६,२२० रुपये किमतीची अंदाजे १० ते १२ वर्षे वयाची चार खैराची झाडे तोडली आहेत. यापैकी एक झाड कटरच्या साहाय्याने मुळापासून कापले असून, उर्वरित तीन झाडे खड्डे खोदून मुळासकट उपटून चोरून नेली आहेत.
या प्रकरणी भूषण सावंत यांच्या तक्रारीवरून राजापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.









