रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील सप्तलिंगी आणि निवळी घाट परिसरात दरड कोसळल्याची घटना घडली आहे. डोंगरावरून माती आणि दगड रस्त्यावर आल्याने काही काळ वाहतुकीचा वेग मंदावला होता. सध्या या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे.
सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पावसामुळे दरडीची माती सैल झाली असून, डोंगरावरून सातत्याने मातीचे ढिगारे रस्त्यावर येत असल्याने परिस्थिती चिंताजनक बनली आहे. अशाच प्रकारे पाऊस सुरू राहिल्यास मोठी दरड कोसळून महामार्ग पूर्णपणे बंद होण्याची शक्यता आहे. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण असून, अपघाताचा धोका टाळण्यासाठी संबंधित प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि प्रवासी करत आहेत. घटनास्थळी अद्याप मदत यंत्रणा पोहोचलेली नसल्याचे वाहनचालकांकडून सांगण्यात येत आहे.









