गॅस अडवणूक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

गॅस पुरवठ्याबाबत पालकमंत्री सामंत यांचा कंपनी प्रशासनाला इशारा

रत्नागिरी:- ‌‘जनतेच्या हक्काचा गॅस रोखून धरण्याचा पराक्रम करणाऱ्या कंपन्यांवर आता थेट गुन्हे दाखल करा,‌’ अशा शब्दांत रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी कंपनी प्रशासनाला चांगलेच झापले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून गॅस कनेक्शनसाठी पैसे भरूनही ग्राहकांना ताटकळत ठेवणाऱ्या महानगर गॅस आणि संबंधित वितरण कंपन्यांची मनमानी आता पालकमंत्र्यांच्या रडारवर आली असून, पुढील 48 तासांत प्रलंबित कनेक्शन देण्याचे कडक आदेश त्यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकारी मनुज जिंदल आणि जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.वैदेही रानडे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत पालकमंत्र्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधनाचा तुटवडा जाणवत असताना, उपलब्ध साठ्याचे वितरण करताना सामान्यांची अडवणूक करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा सज्जड दम त्यांनी भरला. केवळ घरगुतीच नव्हे, तर हॉटेल व्यवसाय, इंडस्ट्री, रेल्वे आणि एसटी कॅन्टीनसाठी सरकारने ठरवून दिलेल्या टक्केवारीनुसारच गॅस वितरण झाले पाहिजे, यात कोणताही गैरव्यवहार किंवा वशिलेबाजी चालणार नाही, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.

ज्या ग्राहकांनी पैसे भरूनही त्यांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे, अशा प्रकरणांत थेट एफआयआर दाखल करण्याचे निर्देश सामंत यांनी प्रशासनाला दिले आहेत. 25 दिवसांच्या नियोजित आराखड्यानुसार वितरण करताना कुठेही गद होणार नाही आणि पारदर्शकता राहील याची काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.