सर्व नियम पाळत असल्याचे स्पष्टीकरण
रत्नागिरी:- खेड लोटे परशुराम येथील लक्ष्मी ऑर्गेनिक इंडस्ट्रीज लिमिटेडच्या रासायनिक प्रकल्पाबाबत राज्य सरकारने महत्त्वाची माहिती दिली आहे. या प्रकल्पाकडे कार्यरत राहण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व पर्यावरणीय मंजुरी आणि प्रदूषण नियंत्रण परवानग्या असल्याचे सरकारने स्पष्ट केले असून, कंपनी नियमांचे पालन करत असल्याचे सांगण्यात आले आहे.
राज्य विधिमंडळात विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना राज्याच्या पर्यावरण व हवामान बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी ही माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केले की, मार्च २०२० मध्ये या प्रकल्पाला विशेष मध्यवर्ती रसायनांच्या उत्पादनासाठी पर्यावरणीय मंजुरी देण्यात आली होती. फेब्रुवारी २०२१ मध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून स्थापनेसाठी संमती मिळाली. जुलै २०२३ मध्ये कामकाजासाठी आणि २०२५ मध्ये विस्तारासाठी आवश्यक त्या सर्व कायदेशीर मंजुरी प्राप्त झाल्या आहेत.
स्थानिक स्तरावर पर्यावरणाच्या मुद्द्यावरून काही आंदोलने आणि निवेदने प्राप्त झाली होती. मात्र, मंत्री मुंडे यांनी नमूद केले की, “एमपीसीबीकडून वेळोवेळी करण्यात आलेल्या सांडपाणी तपासणीत सर्व निष्कर्ष हे निर्धारित निकषांच्या मर्यादेतच आढळले आहेत. हा प्रकल्प वैधानिक अटींनुसारच कार्यरत आहे.”
फेब्रुवारीच्या सुरुवातीला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानेही अशाच प्रकारची भूमिका मांडली होती. राज्यसभा खासदार प्रमोद तिवारी यांच्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी सांडपाणी आणि वायू प्रदूषण नियंत्रण यंत्रणा पूर्णपणे कार्यरत आहेत, धोकादायक कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावली जात आहे तसेच ४ नोव्हेंबर २०२५ रोजी घेतलेल्या चाचणीचे निष्कर्षही नियमांच्या चौकटीत असल्याचे सांगितले होते.
लक्ष्मी ऑर्गेनिक कंपनीने यापूर्वीच स्पष्ट केले होते की, लोटे येथील प्रकल्प भारतीय पर्यावरणीय आणि सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करतो. प्रकल्पातून कोणत्याही प्रकारचे धोकादायक सांडपाणी थेट पर्यावरणात सोडले जात नाही, सर्व प्रक्रियांवर शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया केली जाते.









