Wednesday, May 27, 2026
spot_img
Home Blog रत्नागिरी, चिपळूणमध्ये एक तर राजापूर, खेडमध्ये तीन प्रभाग वाढणार

रत्नागिरी, चिपळूणमध्ये एक तर राजापूर, खेडमध्ये तीन प्रभाग वाढणार

रत्नागिरी:- जिल्ह्यातील सात नगर परिषद व नगर पंचायतींसाठी प्रारुप प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर झाला असून रत्नागिरी आणि चिपळूणमध्ये एक प्रभाग आणि दोन नगरसेवक तर राजापूर आणि खेडमध्ये तीन प्रभाग आणि तीन नगरसेवक वाढणार आहेत. अंतिम प्रभाग रचना 30 सप्टेंबरपर्यंत राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर होणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीची प्रारुप प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर झाला आहे. जिल्ह्यात गुहागरमध्ये एक गट आणि दोन गण वाढले आहेत.

ग्रामीण निवडणुकांचे पडघम वाजू लागले असतानाच आता जिल्ह्यातील नगर परिषद नगर पंचायतींच्या निवडणुकांचेही पडघम वाजू लागले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात ब वर्गाच्या रत्नागिरी आणि चिपळूण तर खेड आणि राजापूर या क वर्गाच्या नगर पालिका आहेत. गुहागर देवरुख आणि लांजा या नगर पंचायती अशा सात ठिकाणच्या प्रारुप प्रभाग रचना कार्यक्रम सुरु झाला आहे. 18 ते 24 जुलै दरम्यान प्रारुप प्रभाग रचना केली जाणार असून 25 ते 29 जुलै या कालावधीत प्रारुप प्रभाग रचना प्रस्ताव नगर विकास विभागाकडे पाठविला जाणार असून तेथून तो मान्यतेसाठी 29 जुलै रोजी राज्य निवडणूक विभागाकडे पाठविला जाणार आहे. त्यानंतर 18 ते 21 ऑगस्ट दरम्यान या प्रभाग रचनांवर हरकती मागविल्याजाणार आहेत. त्यावर 22 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान हरकतींवर सुनावणी होणार आहे. ही सुनावणी झाल्यानंतर 2 सप्टेंबर ते 8 सप्टेंबर दरम्यान अंतिम प्रभाग रचनेचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाला सादर केला जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून 26 ते 30 सप्टेंबर दरम्यान प्रभाग रचना अंतिम करुन जाहीर केली जाणार आहे.