रत्नागिरी:- सप्टेंबर सुरू झाला तरी अद्याप बदल्यांचे आदेश काढण्यात आलेले नाहीत. त्यामुळे बदल्या कधी होणार? कोणते ठिकाण मिळणार? मिळाल्यानंतर राहण्याची व्यवस्था, मुलांच्या प्रवेशाचे काय, अशी चिंता राज्य सरकारचे अधिकारी व कर्मचार्यांना लागलेली आहे.
प्रत्येक वर्षी साधारणतः मे अखेरिस बदल्यांची प्रक्रिया पूर्ण होते. सरकारी कर्मचार्यांच्या दोन ते तीन वर्षाने बदल्या होतात. वर्ग एक, दोन, तीन कर्मचार्यांच्यादृष्टीने बदल्या आणि त्यांचे ठिकाण महत्त्वाचे असते. लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात बदल्या करण्यात आलेल्या होत्या. आता त्या अधिकारी आणि कर्मचारी यांना तीन वर्षे पूर्ण झालेली आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने अधिकारी आणि कर्मचार्यांच्या बदल्या होणार आहेत. बदलीसाठी अनेकांनी पूर्वीपासून फिल्डिंग लावली होती. बदलीनंतर अपेक्षित ठिकाणी जाण्याची तयारी त्यांनी केली होती. मात्र तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जूनअखेर सर्वच बदल्यांना स्थगिती देण्याचे आदेश दिले होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चाळीस आमदारांना बरोबर घेऊन बाहेर पडल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री ठाकरे यांनी जाता जाता आपल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील वर्ग-1 च्या अधिकार्यांच्या बदल्यांचे आदेश काढले. मात्र शिंदे सरकारने त्याला स्थगिती दिली. राज्यात गेल्या आठवड्यात नवीन अधिकार्यांच्या बदल्या केल्या आहेत. आता वर्ग-1 अधिकार्यांच्या बदल्या झाल्या असल्या तरी अद्याप वर्ग दोन आणि तीन व इतर कर्मचार्यांच्या बदल्या झालेल्या नाहीत.