किनारी भागात मासळीचा तुटवडा; मच्छीमार हैराण 

रत्नागिरी:- पारंपरिक मच्छीमार नौकांना 30 वाव अंतरातील समुद्रात जाऊनही मासळी मिळेनाही झाली आहे. इतर वेळेला या मच्छीमार नौका 15 ते 20 वाव समुद्रात मासेमारी करत असतात. मासा तडीला किंवा किनार्‍यालाच येत नसल्याने मासळी मिळत नसल्याचे मच्छीमारांनी सांगितले. त्यामुळे मच्छीमार वर्ग सुद्धा हैराण झाला आहे.

पारंपरिक मच्छीमार नौकांना 15 ते 20 वाव समुद्रात मासेमारी करून बंदरावर परतेपर्यंत प्रतीदिन 6 ते 7 हजार रुपये खर्च येतो. पारंपरिक नौकेवर काम करणार्‍या 6 ते 7 खलाशी आणि तांडेल यांना प्रत्येकी 10 हजार रुपये दरमहा पगार द्यावा लागतो. यांच्यासाठी नौकेत जेवण्याचे साहित्य भरून द्यावे लागते. असा हा खर्च असून तो मासेमारीतून वसूलही होत नाही. मासळी मिळत नसल्याने अनेक पारंपरिक नौका बंदरात उभ्या करून ठेवल्या जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून ही अवस्था आहे. रोजचे दीड दोन हजाराचेही मासे मिळत नाहीत.

पारंपरिक मच्छीमार नौकांना बांगडा, सुरमई, बला आदी मासळी मिळते. परंतू मासा तडीवरच येईनाही झाल्याने नौकांचा मासळी मिळण्याचा रिपोर्ट घटला आहे. रोजच्या 15 ते 20 वावात मासा मिळत नसल्याने या नौका 30 वाव अंतर समुद्रात मासेमारी करण्यासाठी जाऊ लागल्या. तरीही रोजच्या खर्च वसूल होईल इतकाही मासा मिळतच नसल्याचे पारंपरिक नौका मालकांकडून सांगितले जात आहे. वातावरणातील उष्णता वाढू लागल्याही मासा किनार्‍यावर किंवा तडीला येत नसल्याने मच्छीमार नौकांतील जाळ्यात काहीच सापडत नाही.