पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत जि. प. चे 89 विद्यार्थी चमकले

रत्नागिरी:-  शिष्यवृत्ती परिक्षेत पाचवीच्या गुणवत्ता यादीमध्ये जिल्हा परिषदेचे ८९ विद्यार्थी चमकले. जास्तीत जास्त विद्यार्थी गुणवत्ता यादीत येण्यासाठी गेली दोन वर्षे गुणवत्ता कक्षाची स्थापना करण्यात आली होती. गतवर्षीच्या तुलनेत आठ विद्यार्थ्यांची भर पडली असून पाचवीच्या एकुण विद्यार्थ्यांपैकी साठ टक्के विद्यार्थी परिक्षेत सहभागी झाले होते.

पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परिक्षेचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. पाचवीतील ७ हजार १९५ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली होती. त्यामध्ये ४ हजार ८९६ जिल्हा परिषदेचे विद्यार्थ्यांनी आहेत. या परिक्षेत गुणवत्ता यादीमध्ये जिल्ह्यातील २८० विद्यार्थी चमकले असून जिल्हा परिषदेचे ८९ विद्यार्थी आहेत. सर्वाधिक राजापूरचे विद्यार्थी यादीत असून त्यापाठोपाठ दापोलीचा क्रमांक लागतो. तत्कालीन शिक्षण सभापती दिपक नागले, माजी अध्यक्ष रोहन बने, समाजकल्याण सभापती परशुराम कदम यांच्यासह अन्य सदस्यांनी शिष्यवृत्ती परिक्षेतील गुणवत्ता यादीत जिल्हापरिषदेच्या विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी करावी यासाठी सातत्याने प्रश्‍न उपस्थित केला होता. त्यानंतर प्रशासनाकडून त्यावर कार्यवाही सुरु झाली. पाचवी, आठवीतील शंभर टक्के विद्यार्थी या परिषला बसले पाहीजे असा आग्रह सदस्यांनी धरला. कोरोनातील परिस्थितीमध्येही शिक्षण विभागाकडून शिष्यवृत्ती परिक्षेवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे यंदा जिल्हा परिषदेच्या पाचवीतील ५ हजार १८५ जणांनी परिक्षेसाठी अर्ज भरला होता. कोरोनातील परिस्थितीमुळे तीनशे विद्यार्थ्यांना परिक्षा देता आली नव्हती. तरीही उत्तीर्ण झालेल्यांचा टक्का अधिक आहे. शहरी विद्यार्थ्यांच्या तुलनेत परिक्षा दिलेल्यांची संख्या अधिक आहे. गुणवत्ता यादीत शहरी भागातील विद्यार्थ्यांचे वर्चस्व असले तरीही भविष्यात त्यादृष्टीने नियोजन सुरु आहे. याचेच फलीत म्हणून राष्ट्रीय गुणवत्ता यादीत निवे-जोयशी वाडीतील एक विद्यार्थीनी चमकली आहे. शिष्यवृत्ती सरावाचा दापोली तालुक्याचा पॅटर्न प्रसिध्द झाला होता. तोच पॅटर्न अन्य तालुक्यातही राबवली जाणार आहे. रत्नागिरी तालुक्यात समाजकल्याण सभापती परशुराम कदम यांनी शिष्यवृत्तीसाठी मोफत सराव परिक्षांची अंमलबजावणी सुरु केली आहे.