रत्नागिरी:- शहरातील माळनाका येथे विनाकारण वाद घालून दुखापत करणाऱ्या संशयिताविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माने (पुर्ण नाव पत्ता माहित नाही) असा संशयित आहे. ही घटना शनिवारी (ता.८) दुपारी तीन च्या सुमारा माळनाका येथील सिल्व्हर स्वाईन हॉटेल समोर घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी आशिष सावंत हे मोटार (क्र. एमएच-०८ एएक्स ७७५८) घेऊन मारुती मंदिर ते आठवडा बाजार असे जात असताना त्यांचे मित्र सुमित तुकाराम शिवलकर याने त्यांच्या मालकीची मोटार (क्र.एमएच-०५ डीएच ८७८६) ही त्यांचे गाडीचे पुढे चालवित हॉटेल सिल्व्हर स्वॉईन माळनाका येथे आले असता संशयित माने दुचाकी घेऊन तेथे आला व सुमित शिवलकर यांची अचानक थांबवून विनाकारण वाद घातला त्यावेळी फिर्यादी आशिष हे गाडीतून उतरुन काय झाले असे विचारले असता संशयिताने पाठीमागून कमरेतून चाकू काढून फिर्यादी यांचा मित्र सुमित यांच्या पाठीत मारला तर फिर्यादी हे सोडवा-सोडव करण्यासाठी गेले असता संशयिताने रस्त्यावर पडलेला दगड फिर्यादी यांच्या मारुन दुखापत केली. यामध्ये आशिष अनिल सावंत (३०, रा. सडामिऱ्या, चौसोपीवाडा, रत्नागिरी) व सुमित तुकाराम शिवलकर (रा. सडामिऱ्या, रत्नागिरी) हे जखमी झाले. या प्रकरणी आशिष सावंत यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित माने यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.