श्रमिक पतसंस्थेतून चोरीला गेलेले अर्धा किलो सोने बनावट

रत्नागिरी:- राजापूर तालुक्यातील मिठगवाणे येथील श्रमिक पतसंस्थेची शाखा फोडणाऱ्या चोरट्यांनाही बनावट सोने तारण ठेऊन बॅंका, पतसंस्थांची फसवणुक करणाऱ्या टोळीचा फटका बसला आहे. चोरीला गेलेल्या एकुण ५ किलो सोन्यापैकी अर्धा किलो सोने बनावट असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला.

राजापूर तालुक्यातील मिठगवाणे येथील श्रमिक पतसंस्थेची शाखा फोडून सुमारे ९० लाख रुपये किमंतीचे २०० तोळे पेक्षा जास्त सोने लांबविल्याच्या प्रकरणाच्या तपासासाठी जिल्हा पोलीसांनी विविधे पथक स्थापन केली आहे. नाटे पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे स्वतंत्र पथक जबरी चोरी करणाऱ्या चोरट्यांच्या शोध घेत आहेत. मात्र राजापूर तालुक्यातील अतिशय दुर्गम व किनारपट्टीवर असलेल्या गावात हे चोरटे कसे आले, याचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे. मात्र स्थानिकाचा मदतीशिवाय पतसंस्था फोडणे चोरट्यांना शक्य नसल्याने पोलिस त्यादृष्टीने तपास करत आहेत. पोलिसांचे एक पथक अजुनही त्या भागात कार्यरत आहे. या चोरीच्या चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या एका संशयिताकडुन बनावट सोनेतारणद्वारे कर्ज प्रकरणे करून बॅंका, पतसंस्थांची फसवणुक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला. यामध्ये कोट्यावधीचा चुना संशयितांनी लावला. कोल्हापूर येथील सोनाराने दिल्लीतून नखली दागिने मागवून त्यावर सोन्याचा मुलावा देऊन ही फसवणुक केली. या प्रकरणी संशयितांना अटक करून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान मिठगावणे पतसंस्थेमध्येही बनावट सोन्याद्वारे कर्ज प्रकरण झाल्याचे दिसत आहे. पोलिस तपासात असे निष्पन्न झाले आहे की चोरीला गेलेल्या एकुण ५ किलो सोन्यापैकी अर्धा किलो सोने बनावट आहे. त्यामुळे बनावट सोन्याद्वारे कर्ज प्रकरण करणाऱ्या टोळीचा चोरी करणाऱ्या या टोळीला फटका बसला आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी ही अधिकृत माहिती दिली.