कारवांचीवाडी- रवींद्र नगर येथे घर फोडून साडेनऊ लाखांचे दागिने लंपास

रत्नागिरी:- शहर व शहरपरिसरात चोरट्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे आहे. शनिवारी कारवांचीवाडी- रवींद्र नगर येथे चोरट्याने घरफोडी करुन सुमारे साडेनऊ लाखाच्या दागिन्यावर डल्ला मारला. चोरट्यांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना शनिवारी (ता. २५) रात्रीच्या सुमारास घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी संतोष शांताराम गार्डी (रा. रवींद्रनगर-कारवांचीवाडी, रत्नागिरी) हे शनिवारी गावाला गेले होते. ही संधी साधून चोरट्याने त्यांच्या घराचा पुढचा दरवाजा कोणत्यातरी धारदार हत्याराने उचकटून आत प्रवेश केला. घरातील लोखडी कपाटाचे लॉकर उचकटून त्यांनी त्यात ठेवलेले सोन्यांच्या दागिन्यावर डल्ला मारला. कपाटात १८ तोळे सोन्याचे दागिने होते सुमारे साडेनऊ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने चोरुन नेला. रविवारी (ता. २६) गार्डी हे गावावरुन कारवांचीवाडी येथील रहात्या घरी आले असता त्यांना हा प्रकार निदर्शनास आली. या प्रकरणी गार्डी यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.