कोट्यावधी रुपयांचा चुना लावणाऱ्या आरजू टेक्सोल कंपनीच्या संचालकांवर अखेर गुन्हा दाखल

रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकात तक्रार दाखल; अजूनही अनेक तक्रारदार पुढे येण्याची शक्यता

रत्नागिरी:- रोजगार देण्याचे सांगून लाखो रुपये घेत अनेकांची फसवणूक करणाऱ्या रत्नागिरीतील मिरजोळे एमआयडीसीतील आरजू टेक्सोल कंपनीविरोधात अखेर रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एका गुंतवणूकदाराने पुढे येत आपली 18 लाखांची फसवणूक झाल्याची तक्रार ग्रामीण पोलिसात दिली आहे.

तक्रारीनुसार, आरजू टेक्सोल कंपनीचे प्रसाद शशिकांत फडके रा. गावखडी, संजय विश्वनाथ सावंत, संजय गोविंद केळकर, अनि उर्फ अमर महादेव जाधव यांच्यावर भा.दं.सं.क. ४०६,४२०,३४ सह महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम १९९९ चे कलम ३,४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यातील संशयित आरोपींनी जून २०२१ मध्ये आरजू टेक्सोल हि कंपनी स्थापन केली होती. २५ हजार ते ४० लाख रुपये पर्यंत वेगवेगळ्या डिपॉझिटच्या १५ महिने, ३६ महिने व ६० महिने या मुदतीच्या स्कीम सांगून आरोपींनी फिर्यादी यांना खिळे बनवण्याचे ॲटॉमिक मशीन, कच्चा माल तसेच माल तयार केल्यावर मोबदला देतो असे खोटे आश्वासन दिले होते. फिर्यादी यांनी गुंतवणूक केलेल्या १८ लाख रुपयांवर १६ टक्के प्रमाणे २ लाख ८८ हजार रुपये इतकी रक्कम दरमहा परतावा देतो तसेच १५ महिने पूर्ण झाल्यावर भरलेली डिपॉझिटची रक्कम परत देतो असे देखील सांगितल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याबाबतचे ॲग्रीमेंट देखील करून देतो असे आरोपींनी सांगितले होते. मात्र आजवर असे कोणतेही ॲग्रीमेंट केले नाही व मोबदला म्हणून कोणतीही रक्कम देखील दिली नाही असे तक्रारदराचे म्हणणे आहे. आरोपींनी संगनमताने १८ लाखांची फसवणूक केल्याचे तक्रार दराने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

२५ हजारापासून लाखो रुपये गुंतावणाऱ्या अनेकांची फसगत या कंपनीकडून झाल्याचे बोलले जात आहे. हा आकडा कोट्यावधी रुपयांच्या घरात जाऊ शकतो अशी चर्चा देखील आहे. अनेकांनी पै पै करून जमवलेले पैसे या कंपनीत गुंतवले होते. काही महिलांनी तर आपले दागिने विकून या कंपनीत गुंतवणूक केली होती. अशाच पद्धतीने अनेक कंपन्यांनी आजवर रत्नागिरीकरांना चुना लावलेला आहे, मात्र अजूनही शहाणपण येताना दिसत नाही. आज एकाने धाडस करून पोलिसात तक्रार दिली आहे. हेच धाडस इतर गुंतवणूकदरांनी दाखवले तर कायदेशीर मार्गाने गुंतवलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे.